
दगदगीच जीवन, सातत्याने वाढणारी जीवघेणी स्पर्धा, सुरळीत आयुष्य जगण्याच्या प्रयत्नात तितकाच वाढत जाणारा गुंता, दिवस-रात्र विविध चिंतांनी ग्रासलेला मन. या सगळ्यातून एखाद्या दिवसाखेर कुठेतरी वाटत बस! थोडं थांबायला हवं.
परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व ताकद एकवटून आणखी एका 'रोजसारख्या' दिवसाला सामोरे जायला आपण सज्ज होतो. आणि एक मोठा कालावधी लोटल्यावर आपल्याला या आव्हानात्मक आयुष्याचा कंटाळा यायला लगतो. आरश्यात पाहिल्यावर आपलीच प्रतिमा आपल्याकडे अनोळखी नजरेने पाहायला लगते.
बरच काही कमवल्यानंतरही जिंकल्याचा आनंद होत नाही कारण एक महत्वाची गोष्ट आपण हरवून बसलेलो असतो. ती गोष्ट म्हणजे ' माझ्यातला मी'.
हि अनुभूती आज न उद्या बहुतेकांच्या वाट्याला येणारच असते. याचं कारण म्हणजे सतत संसाराच्या, कामाच्या, भविष्यातील चिंतांच्या मागे धावताना आपण स्वतःकडे पहायचं विसरून जातो.
अश्या भांबावलेल्या अवस्थेत आपण असाल तर तो एकाच गोष्टीच संकेत आहे तो म्हणजे स्वतःचा शोध घ्या.
त्यासाठी एखाद दिवस काढा स्वतःसाठी. हो एक दिवस फक्त स्वतःसाठी. जागा ठरवा. एखाद निसर्गरम्य ठिकाण, एखादा समुद्र किनारा, असे कोणतेही ठिकाण जिथे तुमच्या सोबत असेल मन प्रसन्न करणारे वातावरण आणि एकांत. अश्यावेळी सोबत घड्याळ नको, मोबाईल नको. थोडक्यात तुम्हाला स्वतःपासून दूर नेईल अशी एखादीही गोष्ट नको. डोकावून पहा स्वतःमध्ये. स्वतःला विचार -
"मी जे करतोय त्या मध्ये खरोखरच खुश आहे?"
"हेच ते आयुष्य आहे जे मला जगायचय?"
जर नाही तर "अश्या कोणत्या गोष्टीना मी वेळ द्यायला हवा ज्याने माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल ?"
किंवा
"आज जर मला अपयशी व्हयाची भीती नसेल तर मी कोणतं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता?"
किंवा
"आज मी जे करतोय त्यात माझी बुद्धिमत्ता पणाला लागत आहे का?
-मी दिवस रात्र एक करून हि गोष्ट करायला तर असतो का?
-मी जे करतोय ते इतर कित्येक लोकांची गरज आहे का?
-आणि हे काम करताना माझी सद्सदविवेकबुद्धी मला साथ देतेय का?" या अगदी शेवटच्या प्रश्नात उद्भवलेल्या प्रश्नांपैकी एकच जरी उत्तर 'नाही' असेल तर विचार करायला हवा.
अश्या कामाचा शोध घ्या ज्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता पणाला लागेल. ज्या गोष्टीचं तुम्हाला वेड असेल . जे काम कित्येकांची गरज असेल आणि ज्यात तुमची सद्सदविवेकबुद्धी तुम्हा ला साथ देईल.
एक अखंड दिवस असा घालवा ज्यात या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आणि जिथे तुम्हाला याची अनुबुती आली, अर्थपूर्ण आयुष्याची सुरुवात झालीच समजा.
मग वाट कसली बघताय? टाका एक सुट्टी स्वतःच्या नावावर आणि लागा कामाला! देव तुम्हाला स्वतःची गाठ घडवून देण्यास मदत करो हीच शुभेच्छ्या!
प्रतिक्रिया कळवा.
- विनोद अनंत मेस्त्री